संगमनेर रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक

शासनाकडून 316 कोटींची उधळपट्टी मग रेल्वे शिर्डी मार्गे का पळवली

संगमनेर प्रतिनिधी दि १३ डिसेंबर २०२५–मुंबई,नाशिक,पुणे सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक – पुणे रेल्वे करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मोठा पाठपुरावा केला. यानंतर रेल्वे मंजूर होऊन 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले. मग आता रेल्वे मार्ग का बदलला गेला असून नाशिक – पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे अशी आग्रही आणि आक्रमक मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर अधिवेशनात केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात नाशिक – पुणे रेल्वे चा प्रश्न आमदार सत्यजित तांबे आणि आक्रमकपणे उचलून धरला. यावेळी अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे, तालिका सभापती श्री.कृपाल तुमाने होते तर विविध मंत्री व इतर सदस्य सभागृहामध्ये उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक – पुणे रेल्वे करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला. त्या माध्यमातून रेल्वे मंजूर झाली. राज्य शासन महारेल विभागाच्या वतीने रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले. या रेल्वेमार्गाकरता 100 हेक्टर जमिनीची अधिग्रहण झाली असून राज्य शासनाकडून 316 कोटी रुपये खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता मार्ग बदलण्याचा घाट घातला जात आहे.

नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, चाकण असा हा मार्ग अत्यंत गरजेचा आणि योग्य आहे. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ला त्याचबरोबर अष्टविनायकांमधील ओझर आणि लेण्याद्री हे तीर्थस्थळ सुद्धा जोडता येणार आहे.
मात्र आता शिर्डी अहिल्यानगर हा मार्ग कोणत्या उद्देशाने झाला. हे काही कळत नाही. या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून हा मार्ग संगमनेर मार्गेच केला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. आणि याशिवाय 316 कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारने जी 100 हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे. त्याची राज्य सरकार काय करणार आहे हा मोठा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर रेल्वेचे नाव लागले आहे. शेतकरी हे पैसे परत देऊ शकणार नाही मग 316 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्यानंतर मार्ग बदलण्याची गरज काय असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला याचबरोबर या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन केंद्राकडे जाऊन तातडीने हा मार्ग संगमनेर मार्गेच झाला पाहिजे. यासाठी सरकारने पाठपुरावा केला पाहिजे अशी आग्रही मागणी विधान परिषदेमध्ये त्यांनी केली.
यावर राज्य सरकारच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले, राज्य सरकार या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन केंद्राकडे जाण्यासाठी प्रयत्न करेल असे उत्तर त्यांनी दिले. या उत्तरावर समाधान न झाल्याने आमदार सत्यजित तांबे चांगलेच आक्रमक झाले.
अधिवेशनात आणि रस्त्यावर आमदार तांबे आक्रमक
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक – पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वपक्षीय नागरिकांची बैठक घेतली असून या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची ते बैठक घेणार आहेत. सोशल मीडिया कॅम्पियन, सह्यांची मोहीम, ऑनलाइन ई-मेल अशीच जन आंदोलन सुरू असून अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार तांबे यांनी आक्रमक पद्धतीने रेल्वेची मागणी लावून धरली आहे. राजकारण न करता सर्वांनी संगमनेर मार्गे रेल्वे करता पाठिंबा द्यावा असे आवाहन रेल्वे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



