‘गोदाकाठ महोत्सव’ बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ-आ.आशुतोष काळे

‘गोदाकाठ महोत्सव’ बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ-आ.आशुतोष काळे
२०२६ च्या गोदाकाठ महोत्सवाचे शानदार आणि जल्लोषात उद्घाटन संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १० जानेवारी २०२६:-घसं सार आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील असंख्य महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने सुरु केलेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ ठरला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव २०२६’ चे उदघाटन अतिशय शानदार व मोठ्या जल्लोषात मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या मा.संचालिका चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले

यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, फूड फेस्टिवलच्या माध्यमातून सुरु झालेल्या गोदाकाठ महोत्सवाने मागील ११ वर्षांपासून सातत्याने बचत गटाच्या महिलांना उभारी देण्याचे काम केले असून गोदाकाठ महोत्सव हा केवळ एक उत्सव न राहता बचत गटाच्या महिलांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा सारथी बनला आहे. पवित्र गोदावरी नदीच्या काठावर भरविण्यात येणाऱ्या या गोदाकाठ महोत्सवातून महिलांनी आपल्या कौशल्यातून मेहनतीने आणि जिद्दीने तयार केलेल्या घरगुती उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.घरातील चार भिंतीत अडकून न राहता महिलांनी आपल्या हातातील कौशल्याला व्यवसायाचे रूप दिले. लोणची, पापड, मसाले, खाद्यपदार्थ, हस्तकला, शेतीपूरक उत्पादने यासारख्या वस्तूंच्या विक्रीतून महिलांनी केवळ आर्थिक उत्पन्न मिळवले नाही तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली हि गोदाकाठ महोत्सवाच्या यशाची पावती आहे.

बचत गटाच्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे आणि दिशा देण्याचे कार्य प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी मातृत्वाच्या भावनेतून केले आहे. तर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी महिलांच्या क्षमता ओळखून त्यांच्या क्षमतेला वाव मिळवून देतांना त्यांना आर्थिक व्यवहार, संघटन आणि स्वावलंबनाची वाट दाखवली त्यामुळे बचत गटाच्या महिलांना स्वतःच्या पंखांची आणि सामर्थ्याची जाणीव झाली. अशा समाज परिवर्तनाच्या कार्यात काळे परिवार नेहमीचा अग्रभागी राहिला असून अशा सामाजिक कामाला माझे सदैव सर्वोतोपरी सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी यावेळी असल्याचे सांगितले.
यावेळी सौ.पुष्पाताई काळे म्हणाल्या की, गोदाकाठ महोत्सव हा बचत गटांच्या महिलांसाठी केवळ उत्पादन विक्रीचा मंच नसून तो त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा टप्पा ठरला आहे. घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडलेल्या महिलांना या महोत्सवाने स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी दिली. अनेक महिलांसाठी हा पहिलाच अनुभव होता, जिथे त्यांच्या मेहनतीला किंमत मिळाली आणि त्यांच्या कौशल्याला समाजमान्यता प्राप्त झाली. या महोत्सवामुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची जाणीव निर्माण झाली. स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या उत्पन्नामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला, निर्णय क्षमतेला बळ मिळाले आणि कुटुंबातील स्थान अधिक सन्मानाचे झाले. या बदलाचा परिणाम केवळ त्या महिलांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबांवर व संपूर्ण समाजावरही सकारात्मकरीत्या झाला.गोदाकाठ महोत्सवाने महिलांच्या संघर्षाला दिशा देवून त्यांच्या स्वप्नांना नवी वाट दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उद्योजक कैलास ठोळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नायब तहसीलदार सौ. प्रफुल्लिता सातपुते, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, गटविकास अधिकारी संदीप दळवी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, इतर पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, बचत गटांच्या महिला, शालेय विद्यार्थी, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
महिलांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देवून त्यांना निर्णयक्षम, स्वयंपूर्ण
आणि आत्मसन्मानी बनवणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण आहे. त्या दृष्टीने महिलांना विश्वास,संधी आणि व्यासपीठ देणारे उपक्रम राबविणे महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत सकारात्मक आणि परिणामकारक पाऊल ठरतात. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना व त्यांच्या कौशल्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले घरगुती उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ यांद्वारे महिलांना स्वतःच्या श्रमाचे आर्थिक मूल्य समजते. स्वतः तयार केलेल्या उत्पादनामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना आर्थिक निर्णयांमध्ये सहभाग घेता येवून कुटुंबातील त्यांचे स्थान अधिक सन्मानाचे झाले असून ‘मी करू शकते’ ही भावना महिलांच्या मनात रुजवण्याचे महत्वपूर्ण काम गोदाकाठ महोत्सवाने करून दाखवले आहे.
-सौ.चैतालीताई काळे
कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करुन रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येवून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करुन कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले.गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नागरीकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. आ.आशुतोष काळे व तेजतारा फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘शिलाई मशीन प्रशिक्षण‘ शिबिरातील ६० महिलांना शिलाई मशीनचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.




