आपला जिल्हा

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अविरत प्रयत्नांतून सह्याद्रीची यशोगाथा – डॉ. सुधीर तांबे

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अविरत प्रयत्नांतून सह्याद्रीची यशोगाथा – डॉ. सुधीर तांबे

सार्थक बिबवे, तेजस अभंग, शुभांगी गौतम तालुक्यात अव्वल

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ५ मे २०२६ :
इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होताच सह्याद्री ज्युनिअर कॉलेज, संगमनेरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यंदा सार्थक बिबवे आणि शुभांगी गौतम यांनी अनुक्रमे विज्ञान व कला शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात राज्यात पहिला क्रमांक मिळवत सह्याद्रीच्या शिरपेचात माचा तुरा रोवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य खेमनर एस.एम. सर यांनी केले आपल्या प्रस्ताविका त्यांनी वर्षभरातील विविध उपक्रमांची व बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशोगाथा नमूद दिली.

जाहिरात

समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, यश हे योगायोगाने मिळत नाही; ते सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासातील शिस्त आणि मानसिक स्थैर्य यांचा परिणाम असतो. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर मिळणारे यशच टिकाऊ ठरते आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची भक्कम पायाभरणी करते.
ते पुढे म्हणाले की, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज ही संस्था विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन स्वीकारून कार्यरत आहे. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत सुधारणा करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे ही संस्थेची प्राथमिकता आहे. पालक, शिक्षक आणि संस्था यांच्यातील सुसंवाद हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आधारस्तंभ असून, पालकांनीही रचनात्मक सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.

जाहिरात

संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना नमूद केले की, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपली आहे. शिक्षकांना सक्षम करण्यासाठी नियमित प्रशिक्षण उपक्रम राबवले जातात, ही बाब संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची किल्ली आहे.
संस्थेचे संचालक बाबा खरात यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या चिकाटीला, पालकांच्या पाठबळाला आणि शिक्षकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाला दिले. ‘डायमंड बॅच’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून, ही यशाची मालिका पुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यात प्रथम आलेल्या सार्थक बिबवे या विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यांना यशाचे प्रमुख घटक मानले. साप्ताहिक चाचण्या आणि शंका-निरसन सत्रांमुळे अभ्यासातील त्रुटी वेळेवर दुरुस्त करता आल्या, असे त्याने सांगितले. शुभांगी गौतम या विद्यार्थिनींनी सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच यश शक्य झाल्याचे नमूद केले. वाणिज्य शाखेच्या स्नेहल हासे या विद्यार्थिनीने शिक्षक मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करतात असे मनोगत व्यक्त करताना सांगितले

जाहिरात

उल्लेखनीय कामगिरी: यंदाच्या निकालात विषयनिहाय उल्लेखनीय यश नोंदवण्यात आले. भौतिकशास्त्र विषयात सार्थक बिबवे राज्यात प्रथम आला, तर गणित विषयात सार्थक बिबवे आणि तेजस अभंग यांनी राज्यात अव्वल स्थान पटकावले. विविध विषयांमध्ये ९० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३० पेक्षा अधिक असून, ही बाब संस्थेच्या शैक्षणिक दर्जाची साक्ष देणारी ठरली.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पालक आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, नियोजन आणि प्रेरणादायी वातावरण यांचा प्रत्यय आला.
समारंभास संस्थेचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी श्री चेतन मुर्तडक,प्राचार्य खेमनर एस.एम. , उपप्राचार्य संजय सुरसे, पर्यवेक्षक भास्कर कुटे, शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ आणि प्रा.नवनाथ गुंड यांनी केले, तर उपप्राचार्य प्रा. एस. पी. सुरसे यांनी आभार मानले.
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या निकालातून केवळ यश नव्हे, तर सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि शैक्षणिक बांधिलकी सिद्ध केली असून, विद्यार्थ्यांच्या अविरत प्रयत्नांतून घडलेली ही यशोगाथा आगामी पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे