शिर्डीमध्ये २३ व २४ मे रोजी संरक्षण उत्पादन प्रदर्शनाचे आयोजन

शिर्डीमध्ये २३ व २४ मे रोजी संरक्षण उत्पादन प्रदर्शनाचे आयोजन
विद्यार्थी व नागरिकांना रॉकेट आणि क्षेपणास्त्रे पाहण्याची सुवर्णसंधी
Shirdi vijay kapse दि २१ मे २०२६– शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने २३ आणि २४ मे २०२६ रोजी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्रे विशेष आकर्षण असणार आहेत.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सावळीविहीर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ‘निबे ग्रुप’च्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल. या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे.

शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून, यामध्ये रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत.

उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यासाठी मोठे स्टॉल्स प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विज्ञानप्रेमी, नागरिक आणि महिला या प्रदर्शनाला भेट देतील. तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही एक मोठी संधी निर्माण करून देण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून, रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के.के. रेंजेस व मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. आता या नवीन संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे या ओळखीला अधिक बळ मिळणार आहे.



