कोपरगावकरांना दिलासा, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा : नगराध्यक्ष पराग संधान
कोपरगावकरांना दिलासा, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा : नगराध्यक्ष पराग संधान
कोपरगावकरांना दिलासा, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा : नगराध्यक्ष पराग संधान
पाणीटंचाई कमी होताच नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kopargaon vijay kapse दि १६ जुलै २०२६–कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत नगरपरिषदेने सहा दिवसांऐवजी आता पुन्हा चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे. पावसाअभावी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने काही कालावधीपूर्वी कोपरगाव साठवण तलावातील उपलब्ध पाणी जपून वापरण्यासाठी पाणीपुरवठ्याचे दिवस वाढविण्यात आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या हिताचा विचार करत पूर्ववत चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अशी माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे उपस्थित होते.

धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपरिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून पाणीपुरवठ्याचे अंतर वाढवले होते. नागरिकांनीही या काळात प्रशासनाला सहकार्य करत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला. त्यामुळे शहरातील पाणी व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यास मोठी मदत झाली.
आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो नागरिकांची गैरसोय कमी होणार असून नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.

नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणीपुरवठा पूर्ववत होत असला तरी पाण्याचा वापर अत्यंत जपून व जबाबदारीने करावा. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून भविष्यात पुन्हा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची सवय कायम ठेवणे आवश्यक आहे. पाणी अपव्य होणार नाही यासाठी तोट्या बसवणे आवश्यक आहे. नगरपरिषद नागरिकांना उत्तम व नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यातही आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




