पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे : आ. आशुतोष काळे

पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे : आ. आशुतोष काळे
कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या २०१ अर्जांना मंजुरी

Kopargaon vijay kapse दि १६ जुलै २०२६: शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळावा, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे ८१ आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १२० असे एकूण २०१ अर्ज मंजूर करण्यात आले.

बैठकीस प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, रक्ताटे मॅडम, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राहुल शिरसाठ, अरुण त्रिभुवन, प्रकाश रुईकर, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, एकनाथ गंगुले, सिद्धार्थ शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार काळे यांनी अधिकाऱ्यांना पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची तत्काळ छाननी करून कोणताही पात्र नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा वेळेत निपटारा करावा तसेच लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे विना अडथळा उपलब्ध होतील, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
गावपातळीवर जनजागृती करून पात्र नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासह अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार असल्याचे सांगून, शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, ही शासनाची भूमिका असल्याचे आमदार काळे यांनी नमूद केले. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.




