सीमेवरील जवानांसाठी सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून २,५०० राख्यांची प्रेमभेट

सीमेवरील जवानांसाठी सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून २,५०० राख्यांची प्रेमभेट
देशभक्तीचा अनोखा संदेश; जय हिंद महिला मंच, स्वराज्य कल्याण संस्था व सह्याद्री विद्यालयाचा स्तुत्य उपक्र
Sangmner vijay kapse दि २ ऑगस्ट २०२६ : “राष्ट्ररक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधणे,” हा संदेश देत सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त तब्बल २,५०० राख्या तयार करून भारतीय सैनिकांसाठी पाठवल्या.

जय हिंद महिला मंच, स्वराज्य कल्याण संस्था आणि सह्याद्री विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यंदाही विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने राख्या तयार केल्या. माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या राख्या संगमनेर तालुक्यातील माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या स्वराज्य कल्याण संस्थेच्या सदस्यांकडे सुपूर्त करण्यात आल्या. संस्थेमार्फत या राख्या सीमेवरील भारतीय जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खेमनर, स्वराज्य कल्याण संस्थेचे अध्यक्ष मेजर प्रकाश कोटकर, कॅप्टन भिकाजी भागवत, प्यारा कमांडो लक्ष्मणराव ढोले, सुभेदार मेजर गिरीश एरंडे, कॅप्टन अनिल पावसे, सुभेदार भानुदास पोखरकर, सुभेदार रघुनाथ पवार, सुभेदार गोविंद खरडे, रामनाथ ढोले, सुभेदार मेजर गुंजाळ मतकर, सुभेदार प्रकाश पवार, सुभेदार संभाजी पाचारणे तसेच जय हिंद महिला मंचच्या सौ. सुषमा भालेराव, सौ. सुनिता कांदळकर, राधिका डॉलर, परदेशी ताई उपस्थित होत्या. सह्याद्री विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा दिघे, पर्यवेक्षक किशोर देशमुख, अण्णासाहेब दिघे, मिरा ढोले, अर्चना घोरपडे, गीताराम शेळके, एकनाथ भागवत, वरपे मॅडम यांच्यासह शिक्षक व मान्यवरही उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, “भारतीय सैनिक सण-उत्सव, सुख-दुःख यांची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी सीमांवर खंबीरपणे उभे असतात. त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. सैनिक आणि शेतकरी हे देशाचे खरे आधारस्तंभ असून त्यांच्याविषयी प्रत्येकाने आदर आणि कृतज्ञतेची भावना जपली पाहिजे.”
स्वराज्य कल्याण संस्थेचे अध्यक्ष मेजर प्रकाश कोटकर म्हणाले, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, राष्ट्रप्रेम आणि सैनिकांविषयीचा आदर अधिक दृढ होतो. जय हिंद महिला मंचाकडून दरवर्षी सैनिकांसाठी राख्या व दिवाळीचा फराळ पाठविण्याची परंपरा कौतुकास्पद आहे.” त्यांनी या उपक्रमासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे यांचे आभार मानले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी प्रेम, आपुलकी आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम संगमनेरमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.




