स्व.राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त दिल्ली येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून अभिवादन

भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी हे विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
Sangmner vijay kapse दि २० ऑगस्ट २०२६ एकविसाव्या शतकासाठी विकासाचा व आधुनिकतेचा मंत्र असणाऱ्या विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान देणारे भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी हे या माहिती व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी दिल्ली येथे अभिवादन केले आहे.

नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी,अशोक गेहलोत यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,सचिन पायलट,शशी थरूर हे उपस्थित होते.
आज 20 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील वीरभूमी येथे भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिस्थळावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. काँग्रेस पक्षाचा विचार हा गोरगरीबांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. काँग्रेसने कायम लोकशाही व राज्यघटनेचा विचार जपला आहे.
मात्र सध्या देशांमध्ये लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे.जातीभेदाचे राजकारण सुरू झाले आहे हे देशासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. तरुणांनी आपले भविष्य व देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढले पाहिजे. जगामध्ये आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने मोठी क्रांती केली असून भारतामध्ये या क्रांतीची सुरुवात स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांनी केली. आधुनिकतेचा पाया त्यांनी घातला आहे. संगणक दूरसंचार या क्षेत्राला चालना दिली. पंचायत राज व्यवस्था बळकट केली. युवकांना वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला.

अत्यंत महत्त्वपूर्ण व पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण केल्या. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व भारतरत्न राजीव गांधी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले. भारत मातेच्या या सुपुत्राने देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव राहील असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध वरिष्ठ नेते उपस्थित होते.
संगमनेर मध्ये ही यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे ही भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गा तांबे, संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल,निखिल पापडेजा, अर्चना बालोडे, प्रमिलाताई अभंग, सुरेश झावरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.




