स्व. ॲड. टी. जी. सोनवणे : संघर्ष, न्याय आणि समाजसेवेचा दीपस्तंभ

स्व. ॲड. टी. जी. सोनवणे : संघर्ष, न्याय आणि समाजसेवेचा दीपस्तंभ
कामगारांचे कैवारी, निर्भीड वकील आणि सामान्य माणसाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे समाजपुरुष
Sangmner vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६-संगमनेर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, कामगार, सहकार व विधी क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे स्व. ॲड. त्र्यंबकराव गंगाधर सोनवणे हे केवळ नामवंत वकील नव्हते, तर कामगारांचे कैवारी, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे समर्पित समाजपुरुष होते. न्याय, समता, श्रमिकांचे हक्क आणि दुर्बल-वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, या मूल्यांना त्यांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून जपले.

स्व. ॲड. टी. जी. सोनवणे यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला. अहमदनगर कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित ILS लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. कायद्याचे शिक्षण सुरू असतानाच त्यांना स्टेट बँक, पुणे येथे नोकरी मिळाली. मात्र कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरक्षित नोकरीचा मार्ग न स्वीकारता त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संगमनेरला परत येऊन वकिली करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयातून त्यांच्या सार्वजनिक जीवनाची दिशा निश्चित झाली.

ज्येष्ठ वकील ॲड. ए. बी. जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वकिलीची जडणघडण झाली. कायद्याचा सखोल अभ्यास, प्रभावी युक्तिवाद, न्यायालयीन शिस्त आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा त्यांनी आत्मसात केला. वकिली हा केवळ व्यवसाय नसून अन्यायाविरुद्ध लढण्याचे माध्यम आहे, या भूमिकेतून त्यांनी काम केले. त्यांनी संगमनेर वकील संघाचे अध्यक्षपदही भूषविले.

तरुणपणापासूनच ते कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले. सामाजिक समता, आर्थिक न्याय, श्रमिकांचे हक्क आणि शोषित-वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका ठाम होती. कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली. या प्रवासात कॉम्रेड ज्योती बसू, ए. बी. बर्धन, एस. ए. डांगे, इंद्रजीत गुप्ता, हरकिशनसिंग सुरजीत, जॉर्ज फर्नांडिस, बाबासाहेब ठुबे आणि राम रत्नाकर यांसारख्या विविध नेत्यांसोबत त्यांनी काम केले.

जर्मनी आणि रशिया या देशांना त्यांनी भेट दिली होती. या प्रवासातून आंतरराष्ट्रीय कामगार चळवळ, विविध सामाजिक-आर्थिक व्यवस्था आणि श्रमिकांचे प्रश्न समजून घेण्याची त्यांना संधी मिळाली. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे व्यापक सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची दृष्टी अधिक समृद्ध झाली.
त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कामगार चळवळ. ऑल इंडिया ट्रेड युनियन चळवळीशी सक्रियपणे जोडलेले राहून त्यांनी विशेषतः बीडी व तंबाखू कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, सुरक्षित कामाचे वातावरण, कायदेशीर संरक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी न्यायालयीन तसेच संघटनात्मक पातळीवर सातत्याने लढा दिला. कामगारांना संघटित करणे आणि त्यांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण करणे, यालाही त्यांनी महत्त्व दिले.
संगमनेर रिमांड होमचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. या पदाकडे त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी म्हणून पाहिले नाही. संस्थेतील मुलांचे शिक्षण, संगोपन, समस्या आणि भवितव्य याविषयी त्यांना विशेष आस्था होती. या मुलांशी त्यांनी जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते निर्माण केले. प्रेम, विश्वास, आधार आणि आपुलकीची गरज असलेल्या या मुलांसाठी त्यांनी संवेदनशीलतेने काम केले.
शिक्षण क्षेत्राशीही त्यांचे दीर्घकाळ नाते राहिले. संगमनेर महाविद्यालय तसेच सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अनेक वर्षे ट्रस्टी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीत स्व. सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांचे मार्गदर्शन आणि स्नेह महत्त्वाचा होता. सहकारातून सामान्य माणसाची उन्नती, ग्रामीण विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीचा विचार त्यांनी आत्मसात केला. पुढे त्यांनी अमृतवाहिनी बँक, संगमनेरचे चेअरमन तसेच संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. श्री. बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्याशीही त्यांचे विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध राहिले.
विचारांशी ठाम असतानाही माणसे जोडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. विविध राजकीय पक्ष व विचारधारांतील व्यक्तींशी त्यांनी आत्मीय संबंध जपले. राजकीय मतभिन्नता ही व्यक्तिगत स्नेह किंवा समाजहिताच्या कामाच्या आड येऊ नये, ही त्यांच्या स्वभावातील सहज वृत्ती होती. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठीही त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले.
त्यांचा वकिलीचा वारसा सुपुत्र ॲड. अमित सोनवणे पुढे नेत आहेत. त्यांनीही पुण्यातील ILS लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले असून संगमनेर, पुणे तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ते वकिली करीत आहेत. विशेष म्हणजे स्व. सोनवणे यांचे वकिलीतील गुरू ॲड. ए. बी. जोर्वेकर, तर पुढील पिढीत ॲड. नितीन जोर्वेकर हे ॲड. अमित सोनवणे यांचे गुरू आहेत. दोन कुटुंबांतील दोन पिढ्यांनी जपलेले हे गुरू-शिष्याचे नाते वकिलीच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक ठरले आहे.
स्व. सोनवणे यांच्या संघर्षमय आणि समाजाभिमुख जीवनामागे त्यांच्या कुटुंबाचीही मोलाची साथ होती. पत्नी सौ. लतिका सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्या, यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवासात खंबीर साथ दिली. सुपुत्र ॲड. अमित सोनवणे व अमेय सोनवणे तसेच कन्या सौ. अनया अग्रवाल व सौ. अजया भोत यांनी त्यांचे संस्कार आणि कुटुंबाचा वारसा जपला आहे.
२ ऑक्टोबर १९४२ ते ११ सप्टेंबर १९९४ असा त्यांचा जीवनप्रवास अवघ्या बावन्न वर्षांचा असला तरी वकिली, कामगार चळवळ, राजकारण, सामाजिक न्याय, सहकार, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान मोठे आहे. अन्यायासमोर न झुकणे, दुर्बलांच्या बाजूने उभे राहणे, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे आणि माणसांशी नाते जपणे हा त्यांचा खरा वारसा आहे.
स्व. ॲड. टी. जी. सोनवणे यांचे कार्य आणि विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त पत्नी सौ. लतिका सोनवणे, सुपुत्र ॲड. अमित सोनवणे व अमेय सोनवणे, कन्या सौ. अनया अग्रवाल व सौ. अजया भोत, ॲड. अशोक राहणे, ॲड. नितीन जोर्वेकर तसेच सर्व कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र, सहकारी, कामगार चळवळीतील सहकारी आणि स्नेहीजनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.- शब्दांकन : ॲड. अमित त्र्यंबकराव सोनवणे



