शारदानगर परिसरातील समस्यांबाबत ४ नंबर प्रभागातील नागरिकांचे नगरपरिषदेला साकडे
शारदानगर परिसरातील समस्यांबाबत ४ नंबर प्रभागातील नागरिकांचे नगरपरिषदेला साकडे
शारदानगर परिसरातील समस्यांबाबत ४ नंबर प्रभागातील नागरिकांचे नगरपरिषदेला साकडे

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२५ – कोपरगाव शहरातील शारदानगर परिसरात सांडपाणी, अपूर्ण रस्ते, स्वच्छतेचा अभाव आणि डासांच्या वाढलेल्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्यांबाबत नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.४ मधील शारदानगर येथील रहिवासी डॉ.कुणाल घायतडकर, अमोल गिरमे व स्थानिक नागरिकांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देवून समस्या सोडविण्याबाबत साकडे घातले आहे.

दिलेल्या निवेदनात शारदानगरच्या रहिवाशांनी असे म्हटले आहे की, शारदानगर भागातील नाल्यांची दुरावस्था झाल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तातडीने नाल्यांची साफ सफाई करावी. एस.एस.जी.एम.कॉलेजच्या मागील बाजूस साचलेल्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून निचरा होण्यासाठी योग्य उपाय योजना कराव्या. श्री देवी मंदिर आणि श्री दत्त मंदिर परिसर स्वच्छ करून कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.

आ.आशुतोष काळे यांनी प्रभाग क्र.४ मधील शारदानगर परिसरातील श्री नगर, शारदा नगर, एस. एस. जी. एम.महाविद्यालय रोड, मधील रस्त्यांना निधी देवून या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत परंतु अद्यापही या रस्त्यांची कामे संबंधित ठेकेदाराकडून सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे त्वरित सुरु करावीत. काही रस्त्यांची अवस्था खूपच खराब झाली असून नागरिकांना रोजच्या दैनंदिन वापरात असेलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरीकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अमोल गिरमे यांनी प्रभाग क्र. ४ च्या अंबिकानगर परिसरातील अंतर्गत रस्ते व गटार मंजूर असूनही हे काम अपूर्ण असल्याचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या निदशर्नास आणून देत रस्ते व गटारीचे काम न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत असुन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी केली. नगरपरिषद प्रशासनाने नागरीकांच्या अडचणींची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी डॉ. कुणाल घायतडकर व शारदानगरच्या रहिवाशांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली.
यावेळी ह. भ. प.आण्णासाहेब शिंदे महाराज, अशोकराव नरोडे, संजय थांगे, अशोक टेंबरे, बाबुराव कुटे, दिग्विजय शेळके, एकनाथ चव्हाण, डॉ भाग्यश्री घायतडकर, नेहा शिंदे, प्रतिक्षा पारळकर हसन शेख, ओंकार ठोंबरे, निखिल मढवई, लतीफ शेख, राजेंद्र सूर्यवंशी, मनोज देवठाक, दत्तू पवार, अशोक आवारे, बबनराव आभाळे, शेरू शेख, राजेंद्र निकम, ए. आर. औताडे, मच्छिंद्र गोर्डे, सुरेश मोरे, संजय नळे आदी मान्यवर उपस्थित होते.



