के.जे.सोमैया महाविद्यालयात गोदावरी नदी संवर्धन संमेलन संपन्न
के.जे.सोमैया महाविद्यालयात गोदावरी नदी संवर्धन संमेलन संपन्न
के.जे.सोमैया महाविद्यालयात गोदावरी नदी संवर्धन संमेलन संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १७ फेब्रुवारी २०२५– के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच गोदावरी नदी संवर्धन संमेलन संपन्न झाले. या संमेलनासाठी जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ म्हणुन ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह, महाराष्ट्र प्रदुर्षण नियंत्रण मंडळ मुंबई चे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस उपअधिक्षक चंद्रकांत गवळी, अवर सचिव मंत्रालय मुंबई संदिप ढाकणे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष आजिनाथ ढाकणे, कोपरगाव चे तहसिलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सुहास जगताप, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काका कोयटे, सुधीर डागा, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात आयोजित संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेंद्र सिंह यांनी गोदावरी नदी ही आपली माता असून तिच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. आपल्या सर्वांच्या आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प यावेळी कऱण्यात आला. कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपल्या मनोगतात नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खंत व्यक्त करतानाच नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासकिय पातळीवर देखील मोठे प्रयत्न होत असल्याचे सांगितले. तर चंद्रकांत गवळी यांनी नदी प्रदूषणावर भाष्य करताना सांगितले की नदीच्या दूषित पाण्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. विश्वस्त संदिप रोहमारे यांनी यावेळी दक्षिण गंगा म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या गोदावरी नदी स्वच्छतेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे म्हटले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात गोदावरी नदी संवर्धनासाठी महाविद्यालय करत असलेले कार्य नमूद केले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांचे मनोगतेही संपन्न झाली.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय ते गोदावरी नदीपात्र या मार्गाने वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. या वृक्षदिंडी प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग व ओव्या गायल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती च्या उद्देशाने ‘गोदावरी नदी संवर्धन’ या विषयावर पथनाट्याचे आयोजन केले होते. गोदावरी नदी संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या गोदामाई प्रतिष्ठानचा गोदावरी स्वच्छ्ता मोहिमेला ३०१ आठवडे पूर्ण झाल्याने प्रतिष्ठान च्या वतीने गोदामाई जन्मोत्सव पूजन सोहळा गोदावरी नदी पात्रात कच-देवयानी घाट याठिकाणी साजरा करण्यात आला.

यावेळी गोदामाईची विधिवत पूजा-आरती कऱण्यात आली. गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गोदावरी नदी पात्रात केलेल्या स्वच्छ्ता मोहिमेच्या चित्ररूपी स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कऱण्यात आले. तसेच गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव येथील अनेक युवक-युवतींना त्यांनी मिळविलेल्या नैपुण्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी गोदावरी नदी स्वच्छ्ता मोहिमेची पार्श्वभूमी नमूद करतांना माझा संपूर्ण परिवार आजीवन गोदावरी मातेची सेवा करणार असल्याचा संकल्प केला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. शैलेंद्र बनसोडे, डॉ. संजय दवंगे, डॉ. नितिन शिंदे, प्रा. वर्षा आहेर, डॉ. वसुदेव साळुंके व महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले. या संमेलनासाठी अनेक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर अधिकारी, गोदामाई प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, पर्यावरण प्रेमी नागरिक, नदी प्रहरी यांच्यासह विविध महाविद्यालयांतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.