बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्या स्नेहलच्या कुटूंबाला तात्काळ मदत मिळावी- ॲड.संदीप वर्पे
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्या स्नेहलच्या कुटूंबाला तात्काळ मदत मिळावी- ॲड.संदीप वर्पे

कोपरगाव विजय कापसे दि २ एप्रिल २०२५– अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राहता तालुक्यातील धनगरवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्या स्नेहल संतोष राशिनकर हिच्या कुटुंबाला शासनाने तत्काळ भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते तसेच अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी राशीनकर कुटुंबास सांत्वनपर भेट दिली याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

प्रसंगी अँड संदीप वर्पे यांच्या समवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नितीन शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे मच्छिंद्र भवर, पत्रकार बाबासाहेब मंडलिक, अनिल रक्ताटे, एकनाथ राशिनकर, भाऊसाहेब साखरे, अमोल साखरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अँड संदीप वर्पे यांनी बोलताना सांगितले की, ७ वर्षीय चिमुकल्या स्नेहलला बिबट्याने रात्रीच्या वेळी राहत्या घरापासून उचलून जवळपास १०० फुटापर्यंत फरफडत घेऊन जात असताना रहिवाशांनी आरडाओरडा करताच बिबट्याने जखमी स्नेहलला जागेवर सोडून पळ काढला असता स्थानिकांनी तत्काळ स्नेहलला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता परंतु दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना अत्यंत गंभीर असून शासनाने तात्काळ तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी त्यासोबतच कित्येक दिवसापासून कोपरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयास कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसून तात्काळ पूर्ण वेळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी कारण तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा मुक्त संचार वाढत असून अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत पहावयास मिळत असून जर पूर्णवेळ अधिकारी मिळाला तर या बिबटयावर वन विभाग तातडीने उपायोजना करू शकतो अशी मागणी अँड संदीप वर्पे यांनी केली आहे.





