महायुतीचा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि विकास प्रक्रीयेला मिळालेल्या पाठबळाचा – ना.विखे पाटील

महायुतीचा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि विकास प्रक्रीयेला मिळालेल्या पाठबळाचा – ना.विखे पाटील
महायुतीचा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि विकास प्रक्रीयेला मिळालेल्या पाठबळाचा – ना.विखे पाटील

लोणी विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२५– अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि सुज्ञ मतदारांनी विकास प्रक्रीयेला दिलेल्या पाठबळाचा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे या निकालाने सिध्द झाले असल्याची प्रतिक्रीया पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील १२ पैकी ९ नगर परिषदांमध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूकी नंतर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूकीत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या कार्यावर जनतेने दाखविलेला हा विश्वास आहे.

संघटनात्मक पातळीवर प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या आणि राज्याचे निवडणूक प्रभारी तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून झालेल्या संघटनात्मक बांधणीमुळे भारतीय पक्ष प्रथम क्रमाकांचा पक्ष ठरल्याचा मोठा आनंद आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महायुती सरकारने मागील एक वर्षभरात घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांना जनतेने या निकालातून पाठबळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातही महायुतीला ऐतिहासिक विजय मिळालेला आहे. यापुर्वी विधानसभा निवडणूकीतही जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. जिल्ह्यामध्ये विकासाची प्रक्रीया निरंतरपणे सुरु आहे. सुज्ञ मतदारांनी विकासाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. यामुळेच महायुतीला मिळालेले यश हे विकास प्रक्रीयेला पुढे घेवून जाण्यासाठी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. औद्योगिक विकासाच्या माध्यमातून युवकांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटत आहे. पायाभूत सुविधांना निधीची उपलब्धता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. यासर्व कामाला या निवडणूकीच्या निमित्ताने जनतेने साथ दिली असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
नगर पालिका निवडणूकीमध्ये महायुतीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. विकासाची भूमिका मतदारांपुढे मांडली. त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. महायुतीला साथ देणा-या जनतेप्रतीही कृतज्ञता व्यक्त करुन, आगामी काळातही महायुतीच्या पाठीशी असेच भक्कमपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




