के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्र सैनिकांची महाराष्ट्र पोलीसपदी व एका छात्रसैनिकाची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड
के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्र सैनिकांची महाराष्ट्र पोलीसपदी व एका छात्रसैनिकाची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड
के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्र सैनिकांची महाराष्ट्र पोलीसपदी व एका छात्रसैनिकाची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड
Kopargaon vijay kapse दि १७ एप्रिल २०२६- महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरती २०२५-२६ चा अंतिम निकाल लागला असून, यामध्ये के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तीन विद्यार्थिनी अनुक्रमे, कु. आरती राजेंद्र जगताप , कु. मेघा विजय वाघमारे व कु. कांचन बाबासाहेब वाघमारे यांनी घवघवीत यश मिळवत पोलीस दलात ‘खाकी वर्दी’ परिधान करण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

कु. आरती राजेंद्र जगताप हिची संभाजीनगर पोलीस, कु. मेघा विजय वाघमारे हिची बीड पोलीस म्हणून निवड झाली आहे तर कु. कांचन बाबासाहेब वाघमारे हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात (Maharashtra Security Force) निवड झाली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी (Physical Test) आणि लेखी परीक्षा (Written Exam) अशा दोन्ही टप्प्यांत उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे,”अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (मुली) प्रमुख प्रा. वर्षा आहेर म्हणाल्या की, “कु.आरती राजेंद्र जगताप, कु. मेघा विजय वाघमारे व कु. कांचन बाबासाहेब वाघमारे या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिक असून त्या अनुक्रमे तृतीय वर्ष कला, तृतीय वर्ष वाणिज्य, पदव्युत्तर प्रथम वर्ष या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.
अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवले यश:
या तीनही विद्यार्थिनींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीसाठी अत्यंत खडतर मेहनत घेतली होती. पहाटे उठून मैदानी सराव आणि दिवसा अभ्यासाचे नियोजन या यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोपरगावात आनंदाचे वातावरण:
या विद्यार्थिनींच्या निवडीमुळे गावासह संपूर्ण कोपरगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि कुटुंबाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

“पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करणे हे बालपणापासूनचे स्वप्न होते. वडिलांचे कष्ट आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाले. ही नोकरी केवळ एक रोजगाराचे साधन नसून देशसेवेची संधी आहे.” असे या छात्र सैनिकांनी आपल्या मनोगतात म्हटले.
या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव मा. ॲड.संजीव दादा कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त मा. संदीप रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. विजय ठाणगे यांनी या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय महाविद्यालयातील शिस्त, शारीरिक प्रशिक्षणासाठी दिलेले मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्याला जाते.
“आमच्या विद्यार्थिनींनी पोलीस दलात प्रवेश करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. समाजसेवेसाठी त्यांना शुभेच्छा,” असे व्यवस्थापन सदस्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या यशासाठी कॅप्टन नितीन शिंदे, छात्र सेना अधिकारी ( SD-मुले) व लेफ्टनंट वर्षा आहेर, छात्रसेना अधिकारी (SW मुली) यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल परिसरातून तरुणींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



