संघर्षाचा यशाचा सुवर्णकीरण; भावाच्या त्यागातून घडली बहिणीची भरारी

संघर्षाचा यशाचा सुवर्णकीरण; भावाच्या त्यागातून घडली बहिणीची भरारी
संघर्षाचा यशाचा सुवर्णकीरण; भावाच्या त्यागातून घडली बहिणीची भरारी
Kopargaon vijay kapse दि २५ एप्रिल २०२६– जिद्द, कष्ट आणि कुटुंबाच्या त्यागाच्या बळावर यशाची शिखरे सर करता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे शहरातील उषा पवार! पत्र्याच्या छोट्याशा घरात राहून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या उषाताई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत तालुका पुरवठा अधिकारीपदी निवड मिळवली असून, त्यांच्या या यशाने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
उषाताईंच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष आणि त्यागाची थरारक कहाणी दडलेली आहे. आईने झाडू काम करून संसाराचा गाडा ओढला, तर भाऊ ज्ञानेश्वर पवार यांनी अनेक वर्षे चप्पल-बूट शिवण्याचे व पॉलिश करण्याचे काम करत स्वतःच्या कष्टाच्या पैशातून बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीची झळ अंगावर घेत, बहिणीच्या स्वप्नांना पंख देणारा हा आदर्शवत भाऊ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत “गरीबी आडवी आली तरी स्वप्नांना खीळ बसू दिली नाही,” हे उषाताई पवार यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले असल्याची भावना कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त करत नुकतीच उषा पवार यांची तालुका पुरवठा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अभियंता माधवराव पाटील यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उषाताईंच्या जिद्दीचे कौतुक करत, “संघर्षातून उभे राहून मिळवलेले यशच समाजाला दिशा देणारे ठरते,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. उषाताई पवार यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संघर्षमय परिस्थितीतून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहे. कोपरगावच्या मातीतून उमललेली ही यशोगाथा आज सर्वत्र अभिमानाने सांगितले जात असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटिल यांनी सांगितले.







