संजीवनी सैनिकी स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

संजीवनी सैनिकी स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
साई बोळीज ९४ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

Kopargaon vijay kapse दि ९ मे २०२६– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इ. १० वीच्या परीक्षंचे निकाल जाहिर केले असुन यांत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. काॅलेजच्या कॅडेट साई विष्णू बोळीज यांने ९४ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवत व संजीवनी सैनिकी स्कूलच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करत प्रथम क्रमांक पटकाविला. शैक्षणिक गुणवत्ता, सैनिकी शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाही नेत्रदीपक यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत कॅडेट वेदांत संदीप खेतमाळस याने ९२ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकावर मोहर उमटवली तर कॅडेट पार्थ प्रशांत तळेकर हा ९१ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.यंदाच्या परीक्षेसाठी शाळेचे एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

विशेष म्हणजे, चालू शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय स्तरावरील ’ब्रास बँड स्पर्धेत राष्ट्रीय विजेती’ ठरलेल्या या शाळेने शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवत संस्थेचा लौकिक अधिक उंचावला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणारे हे गुणवंत विद्यार्थी ब्रास बँड स्पर्धेमध्येही आपल्या शाळेचे नेतृत्व करत होते. त्यामुळे शिस्त, नेतृत्वगुण, सांघिकता आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा उत्कृष्ट मिलाफ या विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळाला.

विध्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त श्री. सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य के. एल. दरेकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमांचेही कौतुक करण्यात आले. शिस्त, गुणवत्ता आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या या उल्लेखनीय यशामुळे कोपरगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि पूरक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. त्यामुळेच दरवर्षी संस्थेचा यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये ज्युनिअर कॉलेजची सुविधा उपलब्ध असून येथे एनडीए, सैनिक पूर्वभरती तसेच सैन्य दलातील विविध शाखांसाठी आवश्यक प्रशिक्षण उच्च शिक्षणाच्या तयारी सोबतच दिले जाते. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या स्वप्नातील आदर्श अधिकारी आणि आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत राहू.- सुमित कोल्हे, विश्वस्त





