पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूरच्या पोलिसांची आढावा बैठक

पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूरच्या पोलिसांची आढावा बैठक
पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूरच्या पोलिसांची आढावा बैठक

Loni vijay kapse दि ९ मे २०२६- “ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांचे प्रकार आणि अज्ञात व्यक्तींकडून रात्री निर्माण केले जाणारे दहशतीचे प्रकार गंभीर असून, पोलीस प्रशासनाने या कृत्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. जादा कुमक बोलावून गस्त वाढवावी, तसेच गावागावांत ‘ग्राम सुरक्षा दल’ स्थापन करून नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करावेत,” अशा कडक सूचना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

“राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात चोऱ्या आणि रात्री दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी अवैधरित्या ड्रोन फिरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यापूर्वी कधीही न घडलेल्या अशा घटनांमुळे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीनही तालुक्यांतील पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

अशा चिंताजनक परिस्थितीत पोलीस प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. पंधरा दिवसांपासून या घटनांचे पेव फुटल्याने नागरी जीवन पूर्णपणे भयग्रस्त झाले आहे. पोलीस प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर आल्याने नागरिकांमध्ये सरकार आणि प्रशासनाबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.”

“पोलीस प्रशासनाला सरकारकडून कोणती मदत हवी आहे ते सांगा, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालू नका; अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कोणाचेही असोत, त्यांच्यावर कडक कारवाई करा. समाजात दहशत आणि गुंडगिरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा वेळीच बिमोड करा,” असे आदेश ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
अपुरे मनुष्यबळ असल्यास जिल्हा प्रशासनाकडून अधिकची कुमक मागवून घेण्याचे सूचित करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, “दिवसा आणि रात्रीसुद्धा ग्रामीण भागात गस्त सुरू ठेवा. अनेक गावांमध्ये अनोळखी व्यक्ती आढळल्यास स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची माहिती संकलित करा. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह नवीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. संरक्षणासाठी अजूनही निधी देण्याची आपली तयारी असून, ग्रामपंचायतींनीही यासाठी पुढाकार घ्यावा.” तसेच, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेची मदत घेण्याचेही मंत्र्यांनी यावेळी सूचित केले.
“रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल, पान स्टॉल यांबरोबरच उशिरापर्यंत चालणाऱ्या सर्वच व्यवसायांच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी. स्थानिक पातळीवर ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ‘ग्राम सुरक्षा दला’ची स्थापना करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.”
“जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी संदर्भातील रॅकेट उघड केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करुन, अशा प्रकारच्या तक्रारी पूर्णपणे बंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. अशा गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या कोणालाही सोडू नका; त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश ना.विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.”


