आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; कोपरगाव-निफाडमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी
आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; कोपरगाव-निफाडमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी
आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; कोपरगाव-निफाडमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी
Kopargaon vijay kapse दि २३ जुलै २०२६–कोपरगाव व निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, शासनाने संबंधित कामांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परिसरातील हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोपरगाव मतदारसंघातील हिंगणी, मंजुर, माहेगाव देशमुख, डाऊच, सडे, शिंगवे, पुणतांबा तसेच निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या लोखंडी फळ्या कालांतराने जीर्ण व निकामी झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी साठविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या हजारो एकर क्षेत्रास सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत नवीन लोखंडी फळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शासनाने या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली आहे.

याशिवाय हिंगणी येथील बंधाऱ्याच्या फाउंडेशनमधून होत असलेली पाणीगळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, फुटलेले दगडी प्रूव्हज बदलून नवीन एस.एस. चॅनल प्रूव्हज बसविणे तसेच सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवर संरक्षण रेलिंग उभारण्याची मागणीही करण्यात आली होती. या कामांनाही प्राधान्याने गती दिली जाणार आहे.
जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत तातडीची दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार असून, मोठ्या स्वरूपाची कामे ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे एलिप्टिकल बंधाऱ्यांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे कोपरगाव व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे महत्त्वपूर्ण यश असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


