देश-विदेशातील दीड लाख भाविकांच्या उपस्थितीत कोकमठाण येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

देश-विदेशातील दीड लाख भाविकांच्या उपस्थितीत कोकमठाण येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात
सामूहिक ध्यानधारणा, संतपूजन आणि अखंड अन्नदानाचे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

Kopargaon vijay kapse दि ३१ जुलै २०२६: कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उत्सवात देश-विदेशातून आलेल्या दीड लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. सामूहिक ध्यानधारणा, संतपूजन आणि सत्संग ही या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.

गुरुपौर्णिमेच्या पहाटे ओम गुरुदेव माऊलींचे पूजन आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज आणि उपाध्यक्ष संत निजानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध प्रवचनकार संत कणकेश्वरी माता प्रमुख उपस्थित होत्या.
आश्रमात २३ ते २९ जुलै या कालावधीत अखंड अन्नदान करण्यात आले. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त संत कणकेश्वरी माता यांच्या गुरुगीता कथेवर आधारित प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीही उत्सवात सहभाग घेत गुरुदक्षिणा म्हणून भाजीपाला व धान्य अर्पण केले. भाविकांच्या सत्संगासाठी सुमारे ७० हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला होता.
उत्सवाचे नियोजन आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, उपाध्यक्ष संत निजानंद महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सचिव हनुमंतराव भोंगळे तसेच विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भाविकांच्या सेवा-सुविधांसाठी ७०० हून अधिक स्वयंसेवक कार्यरत होते.
उत्सवादरम्यान केंद्रीय मंत्री कैलास विजयवर्गीय, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, आमदार मंजुळा गावित, संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून ओम गुरुदेव माऊलींचे दर्शन घेतले.
“ध्यान आणि मौनात मोठी शक्ती आहे” – संत परमानंद महाराज
“ध्यान आणि मौनात अपार शक्ती दडलेली आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात ध्यानधारणेसाठी देश-विदेशातून भाविक येतात. गुरुपौर्णिमा उत्सवातही सत्संग, ध्यान आणि अध्यात्माला विशेष महत्त्व दिले जाते. यामुळे भाविकांना आत्मिक शांतता व सकारात्मक ऊर्जा मिळते,” असे आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी सांगितले.




