एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक उत्साहात

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक उत्साहात
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक उत्साहात
Kopargaon vijay kapse दि १९ ऑगस्ट २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमासाठी अग्निशामक अधिकारी हेमंत कार्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

प्रमुख मार्गदर्शक प्रमोद शिनगर यांनी विद्यार्थ्यांना अग्नीचे प्रकार, आग लागण्याची कारणे, आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या उपाययोजना, आग विझविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती तसेच संकटकाळात स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी राखावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “आपत्ती कधीही सांगून येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान वेळ देऊन मार्गदर्शन केले आहे. या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी करावा. नैसर्गिक आपत्तींबरोबरच मानवनिर्मित आपत्ती, रासायनिक दुर्घटना, वायूगळती किंवा आग यांसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आवश्यक आहे.”

यावेळी अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपत्तीच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून घेतली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे प्रभारी उपप्राचार्य रवींद्र हिंगे यांनी केले. यावेळी प्रमोद शिनगर, विशाल कासार, संजय विघाते, घनश्याम कुऱ्हे, कला शाखेचे उपप्राचार्य बंडेराव तऱ्हाळ, कैलास शेळके यांच्यासह ज्युनिअर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता आत्रे व रुपाली गाढे यांनी केले, तर आभार संदीप शिंदे यांनी मानले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळाल्याने कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.



