संजीवनीत एआयवर मार्गदर्शन; पुढील पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होणार – अच्युत गोडबोले

संजीवनीत एआयवर मार्गदर्शन; पुढील पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होणार – अच्युत गोडबोले
संजीवनीत एआयवर मार्गदर्शन; पुढील पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होणार – अच्युत गोडबोले
Kopargaon vijay kapse दि ३० ऑगस्ट २०२६ : तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दशकात अभूतपूर्व बदल झाले असून, आगामी पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे सर्वच क्षेत्रांचे स्वरूप आमूलाग्र बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयचे महत्त्व समजून घेऊन त्याचा प्रभावी वापर आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात तंत्रज्ञान अभ्यासक व लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग तसेच एमबीएच्या प्रथम वर्षातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमाचे दुसरे पुष्प गुंफताना गोडबोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते.
गोडबोले यांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर सविस्तर मार्गदर्शन केले. थ्री-डी प्रिंटिंग आणि एआयच्या साहाय्याने बांधकाम क्षेत्रात क्रांती होत असून, अवघ्या २४ तास ४५ मिनिटांत दहा मजली इमारत उभारण्याचा विक्रम शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. एआयमुळे रचना, नियोजन आणि अंमलबजावणी अधिक अचूक व जलद होत असल्याने वेळ, खर्च आणि मनुष्यबळाची बचत होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्रातही एआयमुळे मोठे बदल होणार असून विद्यार्थ्यांना अधिक वैयक्तिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. भविष्यात शिक्षकांची भूमिका ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी आणि सुविधा उपलब्ध करून देणारी असेल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी एआयकडे केवळ तंत्रज्ञान म्हणून न पाहता भविष्यातील संधी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासूनच आपल्या शाखेनुसार भविष्यातील करिअरच्या दृष्टीने निरीक्षणे नोंदवावीत, तसेच नोकरी, उच्च शिक्षण किंवा उद्योजकता यापैकी कोणता मार्ग निवडायचा, याचा विचार करून स्वतःला सक्षम करावे, असे सांगितले. शाखेचे सखोल ज्ञान, विविध कौशल्ये आणि जपानी, रशियन, जर्मन किंवा कोरियन भाषेचे ज्ञान आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. मनालीताई कोल्हे, डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. ए. बी. पवार, डॉ. व्ही. एम. तिडके आदी उपस्थित होते.
स्वागतपर मनोगतात डॉ. आर. ए. कापगते यांनी संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी रुजविलेल्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. ‘लोकल टू ग्लोबल’ हा संकल्प संजीवनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.



