प्राथमिक शिक्षणाला बळ; पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या संशोधनासाठी निधी देणार – ना. राधाकृष्ण विखे पाटील

प्राथमिक शिक्षणाला बळ; पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या संशोधनासाठी निधी देणार – ना. राधाकृष्ण विखे पाटील
प्राथमिक शिक्षणाला बळ; पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या संशोधनासाठी निधी देणार – ना. राधाकृष्ण विखे पाटील
Ahilyanagar vijay kapse दि ५ सप्टेंबर २०२६ : प्राथमिक शिक्षणात गुंतवणूक वाढवून अहिल्यानगर जिल्ह्याला शैक्षणिकदृष्ट्या अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न असून, विद्यार्थ्यांबरोबरच पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शैक्षणिक संशोधनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आ. किशोर दराडे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, राजेश परजणे, नगराध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिक्षणाच्या गुणवत्तेत केलेल्या प्रगतीमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय विद्यालयातील प्रवेशामध्ये शिक्षकांच्या योगदानामुळे जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ही ज्ञानमंदिरे असून त्यांचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
विज्ञान प्रदर्शनासाठी मागील वर्षापासून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्यात आणखी निधी देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी इस्रोपर्यंत पोहोचले असून, त्यांना नासापर्यंत नेण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कोविडनंतर ऑनलाइन शिक्षणाचा विस्तार झाला असला तरी त्याचे काही दुष्परिणामही जाणवत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांतील सकारात्मक बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शाळांमध्ये मोबाईल वापराबाबत शिस्त आवश्यक आहे. तंत्रज्ञान बदलता येणार नाही; मात्र त्याचा शैक्षणिक नवोपक्रमासाठी प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांना इंटरअॅक्टिव्ह बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून उर्वरित शाळांनाही लवकरच ते उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शाळा खोल्यांची कामे पूर्ण झाली असून, प्रत्येक शाळेला शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षापर्यंत शंभर टक्के शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात येईल. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी मुख्याध्यापक व ग्रामसेवकांची समिती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी आ. नरेंद्र दराडे यांनी शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांनी जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पुरस्कारप्राप्त शिक्षिका सुमनताई खतोडे यांनी मनोगत व्यक्त केले.




