सोमैया महाविद्यालयात ‘प्रेमचंद जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी
सोमैया महाविद्यालयात ‘प्रेमचंद जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी
सोमैया महाविद्यालयात ‘प्रेमचंद जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑगस्ट २०२५– “मुंशी प्रेमचंद हे केवळ हिंदी साहित्यातीलच नव्हे तर भारतीय साहित्यातील क्रांतिकारी साहित्यिक आहेत. भारतीय साहित्यामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि दलित-शोषित वर्गाला केंद्रस्थानी ठेवून कथा कादंबऱ्यांचे लेखन करणाऱ्या प्रेमचंदांनी भारतीय साहित्यामध्ये समाज-परिवर्तनासाठी साहित्य सृजनाची मुहूर्तमेढ रोवली”,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केले.

स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेमचंद जयंती समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. ठाणगे बोलत होते.
प्राचार्य डॉ. ठाणगे पुढे म्हणाले की “मुंशी प्रेमचंद यांनी शंभर वर्षांपूर्वी परतंत्र भारतातील रूढी-परंपरा आणि सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी साहित्याला माध्यम बनवले आणि शेकडो कथा- कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांचे साहित्य कालजयी साहित्य आहे. त्यामुळे ते आजही पूर्वीइतक्याच आवडीने वाचले जाते. विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांच्या कथा कादंबऱ्या अवश्य वाचाव्यात.”

याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा-पूजन करून साहित्यसम्राट प्रेमचंद यांना अभिवादन करण्यात आले. हिंदी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक करताना कालजयी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यिक कार्य-कर्तृत्वावर संक्षिप्त प्रकाशझोत टाकत प्रेमचंद हे आजच्या ‘स्त्रीवाद’, ‘दलित साहित्य’, ‘वृद्धांचे साहित्य’, ‘अल्पसंख्यांकांचे साहित्य’ आदी अनेक विचारधारांचे जनक ठरतात असे सांगितले. त्यामुळेच प्रेमचंदांच्या साहित्याचे पुनर्मूल्यांकन होण्याची गरज प्रतिपादन केली.
हिंदी विभागाचे प्रा. किरण सोळसे यांनी आभार-प्रदर्शन व सूत्रसंचालन केले तर प्रा. देशमुख, संशोधक विद्यार्थी श्री. सतीश दवंगे कु. सुरेखा पवार, श्रीमती श्रद्धा सिनगर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



