वारीत नवरात्रोत्सवात ज्योत घेऊन धावल्या महिला; उक्कडगाव येथून आणली ज्योत
राहुल दादा मित्र मंडळातील महिलांचा पुढाकार
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२४ : तालुक्यातील वारी येथील राहुल दादा मित्र मंडळातील महिलांनी यंदाच्या नवरात्रोत्सवात पुढाकार घेऊन श्रीक्षेत्र उक्कडगाव ते श्रीक्षेत्र वारी येथे गुरुवारी (दि.३) घटस्थापनेच्या दिवशी धावत ज्योत आणली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच महिलांनी पुढाकार घेऊन गावात वाजतगाजत ज्योत आणल्याने वारीसह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मंडळाचे यंदाचे सातवे वर्ष होते.
त्यानुसार महिलांनी उक्कडगाव येथून ज्योत आणण्याचे ठरविले. त्यानुसार घटस्थापनेच्या दिवशी सकाळी वारी येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबेची आरती करून महिलांनी उक्कडगाव येथील रेणुका माता मंदिराकडे प्रस्थान केले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उक्कडगाव येथून ज्योत पेटवून वारीच्या दिशेने प्रस्थान केले. अवघ्या चार तासात या महिलांनी हा प्रवास धावत पूर्ण केला. त्यानंतर सायंकाळी वारी गावातून ज्योतची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत महिलांनी पुढाकार घेतल्याने त्यांचा सन्मान म्हणून मंडळाचे मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार रोहित टेके यांच्या संकल्पनेतून सर्व महिलांना फेटे बांधण्यात आल्याने मिरवणुकीत ते विशेष आकर्षण ठरत होते. वारी गावात पहिल्यांदाच महिलांनी ज्योत आणल्याने हा कौतुकाचा विषय होता.
ज्योतला प्रतिसाद म्हणून गावातील सर्वच वयोगटातील असंख्य महिला-पुरुष महिलांवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. शेवटी जगदंबा देवी मंदिरात ही ज्योत स्थापित करण्यात आली. दसऱ्यापर्यंत ही ज्योत तेवत राहणार आहे. विशेष करून महिलांची ज्योत मिरवणूक असल्याने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ गवसने तसेच होमगार्ड अविनाश भारुड, आकाश जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्योत मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्वच महिला, पुरुष, तरुण-तरुणींनी विशेष परिश्रम घेतले.