पांडुरंग सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे प्रतीक – महंत रामगिरीजी महाराज
पांडुरंग सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे प्रतीक –
महंत रामगिरीजी महाराज
श्री हरीहरेश्वर मंदिर -महाराष्ट्रातील एकमेव मंदिर

कोपरगाव विजय कापसे दि ३ मे २०२५– पंढरीचा पांडुरंग सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन हिंदू धर्म रक्षक महंत रामगिरीजी महाराज यांनी केले आहे. राहता तालुक्यातील शिंगवे येथे महाराष्ट्रातील एकमेव असलेले श्री हरिहरश्वर मंदिर प्रतिष्ठापना व सोहळ्या निमित्ताने कीर्तन प्रसंगी ते बोलत होते.

“कंठी धरीला कृष्णमनी”या अभंगाचे विवेचन करताना ते पुढे म्हणाले की भगवंत सर्वांच्या हृदयात आहे तो गोपींच्याही हृदयात आहे. प्रकट होण्याची जी भूमिका आहे ती भक्तीची आहे तर हृदयात आहे ती ज्ञानाची आहे. गोपींची ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेदभाव होत नाही.

वारकरी संप्रदाय हरी आणि हर यामध्ये भेद करत नाही वारकरी संप्रदायातील सर्व संत भगवान शंकराचे वर्णन करतात. सर्व शास्त्र पुराण आणि वेदांचे अध्ययन केले असता शिव आणि विष्णू मध्ये कुठेही भेद दिसलेला नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात सगुण आणि निर्गुण हे समान आहेत. व्यास ऋषी आणि शंकराचार्य यांच्या वाटेवर चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे. विरघळलेले तूप हे निराकाराची उपासना आहे तर थिजलेले तूप हे सगुणाची उपासना आहे. विरघळलेल्या तुपापेक्षा शिजलेले तूप खाण्यास अधिक स्वादिष्ट लागते. गोपींच्या भक्ती पुढे उद्धवाचे ज्ञान अपयशी ठरले. उद्धव हा भगवान श्रीकृष्णाचा अंतरंगातला सखा होता. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना जाणे शक्य होत नव्हते त्या ठिकाणी ते उद्धवाला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवत असत. तो खूप ज्ञानी होता परंतु भक्ती कळावी म्हणून त्याला श्रीकृष्णाने गोकुळात पाठवले. साखर आणि गोडी जशी एकच आहे तसेच हरी आणि हर हे एकच आहेत असे महाराजांनी यावेळी सांगितले .
यावेळी आचार्य भगवान महाराज शास्त्री, ह भ प चांगुणाताई चौधरी महाराज,गणेश महाराज शास्त्री, ह भ प रामभाऊ म. बर्डे, ह भ प चंद्रकांत महाराज सावंत, ह भ प मधुकर महाराज, शिवाजी म. ठाकरे ,नामदेव म. तळेकर, रामभाऊ म.चौधरी , शुभम म. काशीद, कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जनार्दन जगताप,ज्ञानेश्वर म. गुंजाळ, वसंत म .भाकरे ,सुनील काजळे , भीमाशंकर लासुरे, बाबासाहेब लासुरे, प्रकाश बाबुळके, प्रमोद चौधरी, सरपंच ,उपसरपंच आदी सह पंचक्रोशीतील वारी, कान्हेगाव, सडे, शिंगवे, पिंपळवाडी, पुणतांबे, कोपरगाव, रुई ,भोजडे , संवत्सर आदी गावातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप तसेच नियोजन करण्यासाठी शिंगवे येथील तरुण मित्र मंडळ व बजरंग दलातील स्वयंसेवक अथक परिश्रम घेतले.




