स्व. अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या; आ. आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी

स्व. अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या; आ. आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी
स्व. अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्या; आ. आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी

कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२६ – आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जावे अशा स्व. अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्य आणि दूरदृष्टीमुळे आज आपण विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहत आहोत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी स्व.अजितदादांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान सरकारकडे केली आहे.

स्व.अजितदादांनी आपल्या संपूर्ण राजकीय प्रवासात सत्तेचा वापर सामान्य माणसाच्या हितासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी कसा करता येतो याचा आदर्श घालून दिला. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि राज्याच्या कानाकोपऱ्याची जाण यामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहे. याच बरोबर शेकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी धाडसी निर्णय घेतले. केवळ कृषी क्षेत्रच नव्हे तर उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतही त्यांनी टाकलेली पावले मैलाचा दगड ठरणारी आहेत.

राज्याचा तब्बल ११ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम नावावर असलेले आणि कामाचा माणूस अशी देशभर ओळख असणारे स्व. अजितदादांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी केली असून हे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी लोकसेवेचे प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याच बरोबर स्व.अजितदादांच्या नावाने गतिमान नागरिक सेवा पुरस्कार देण्याची घोषणा करून स्व.अजितदादांना अपेक्षित असलेले गतिमान प्रशासन हे या पुरस्काराचे यश असल्याचे दर्शविते.
स्व.अजितदादांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी २०२६-२७ चा अर्थसंकल्प स्व.अजितदादांना समर्पित करण्यात आल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी सभागृहाच्या व राज्यातील नागरीकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे आभार मानले आहे. विकसित महाराष्ट्राचा नकाशा मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून आपल्या डोळ्यासमोर मांडला असून यामध्ये स्व.अजितदादांची सर्वांगीण विकासात्मक दूरदृष्टी दिसून येते. अशा या लोकनेत्याच्या कार्याची दखल घेऊन स्व.अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सुरु असलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली आहे.




