घर व मोठ्या इमारतींसाठी अर्थिंग अत्यंत गरजेची -प्रा. साहेबराव दवंगे
घर व मोठ्या इमारतींसाठी अर्थिंग अत्यंत गरजेची -प्रा. साहेबराव दवंगे
योग्य अर्थिंगमुळे जीवीतहानी टाळणे शक्य

कोपरगांव विजय कापसे दि १२ नोव्हेंबर २०२६–लोक विविध इमारतींच्या बांधकामासाठी लाखो रूपये खर्च करतात. त्यांच्या सुशोभिकरणासाठी आणि आधुनिक विद्युतीकरणासाठीही लाखो रूपये खर्च होतात, मात्र विद्युत उपकरणांना अर्थिंग करण्यासाठी काही ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसते, अथवा अर्थिंग केल्यावर ठराविक काळाने मेंटेनन्स न केल्यामुळे अनेक अपघात होवुन अनेकांचे बळी जात आहेत. तसे होवुच नये यासाठी विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने घरे, आस्थापना तसेच मोठ्या इमारतींना योग्य आणि कार्यक्षम अर्थिंग व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक असल्याचे संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकचे निवृत्त विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जनहितार्थ आवाहन केले आहे.

प्रा. दवंगे पुढे म्हणाले की विजेच्या गळतीमुळे होणारे शॉक, आग लागणे, विद्युत उपकरणांचे नुकसान अशा अनेक गंभीर दुर्घटना अर्थिंगच्या अभावामुळे किंवा निकृष्ट अर्थिंगमुळे घडतात. मात्र अशा घटनांकडे बहुतांश वेळा लोकांचे दुर्लक्ष होते. जोपर्यंत मोठी हानी होत नाही, तो पर्यंत विद्युत सुरक्षेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही बाब चिंताजनक आहे. ते पुढे म्हणाले की, विद्युत दुर्घटनांमध्ये अनेक वेळा कुटूंबाचा कर्ता पुरूष किंवा कर्त्या व्यक्तीचा मृत्यु होतो.

त्यामुळे अनेकांच्या डोक्यावरचे छत्र हरविले जाते. मृत व्यक्तीवर अवलंबुन असलेल्या कुटूंबियांचा आधार तुटतो आणि संपूर्ण कुटूंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळते. ही बाब अत्यंत दुदैवी असुन थोडीशी काळजी घेतली तर असे अपघात टाळता येणे शक्य आहे.
अर्थिंगचे महत्व स्पष्ट करताना प्रा. दवंगे म्हणाले की, योग्य अर्थिंगमुळे विजेचा अनावश्यक प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत उतरवला जातो. त्यामुळे शॉकचा धोका कमी होतो, आग लागण्याची शक्यता टळते आणि विद्युत उपकरणांचे आयुष्य वाढते.

अर्थिंगची तपासणी नियमित करणे गरजेचे आहे. किमान दर सहा महिन्यांनी एकदा अर्थिंगची तपासणी करावी. अनेक ठिकाणी वर्षनुवर्षे अर्थिंग तपासली जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमुद केले. शेवटी प्रा. दवंगे यांनी नागरिकाना आवाहन केले की तज्ञ विद्युत अभियंता किंवा अनुभवी इलेक्ट्रिशियनकडून अर्थिंगची नियमित तपासणी करून घ्यावी, आवश्यकतेनुसार दुरूस्ती करावी किंवा नवीन अर्थिंग व्यवस्था बसवावी, जेणेकरून विद्युत दुर्घटना टाळता येतील आणि मानवी जीविताचे संरक्षण होईल.




