नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्ग मागणीसाठी तालुका एकवटला

लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विद्यार्थ्यांसह लाखो नागरिक करणार पत्रव्यवहार

संगमनेर विजय कापसे दि २२ जानेवारी २०२६– नाशिक – पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर या सोयीच्या मार्गाने व्हावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला. या नैसर्गिक रेल्वे मार्गाचा सर्वे होऊन शेतकऱ्यांना सुमारे 360 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्याने हा मार्ग बदलला गेला. हा मार्ग पुन्हा संगमनेर मार्गेच व्हावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका एकवटला असून तालुक्यातून लाखो विद्यार्थी व नागरिक मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे या मार्गाची मागणी करत आहे.

अभी नही, तो कभी नही हे ब्रीदवाक्य घेऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक – पुणे रेल्वे मार्गाचा लढा तीव्र करण्यात आला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घारगाव या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हा मार्ग संगमनेर वरूनच व्हावा याकरता 15 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

खरे तर नाशिक – पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर वरून नैसर्गिक मार्गे आहे. या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले असून त्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात 360 कोटी रुपयांची भरपाई सुद्धा देण्यात आली आहे. नियोजित सर्व काम सुरू असताना महायुती सरकार सत्तेवर आले आणि नाशिक, सिन्नर, पुलतांबा, अहिल्यानगर,पुणे असा लांब पल्ल्याचा रेल्वे मार्ग नियोजित करण्यात आला. हा आडमार्गाचा रेल्वे मार्ग कोणाच्याही उपयोगाचा नसल्याने या मार्गावरील सर्व नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली यानंतर खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सुद्धा या मार्गाबाबत संसदेमध्ये आवाज उठवला तर विधान परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर मार्गाबाबत आवाज उठवला.
संगमनेर वरून रेल्वे मार्ग हा अत्यंत गरजेचा आहे कारण यामुळे संगमनेर व परिसरातील शिक्षण, शेती, व्यापार, उद्योग आणि रोजगार यांचा भविष्यातील पाया निश्चित होणार आहे. या रेल्वेमार्गाचा अकोले आणि राहता तालुक्यातील नागरिक व युवकांनाही मोठा फायदा होणार आहे. याचबरोबर युवकांना शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे.
त्यामुळे विविध बैठका आंदोलन बरोबर आता संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी,युवक,नागरिक,महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा मार्ग संगमनेर वरूनच व्हावा याकरता मागणी करणार आहे. याबाबत संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधून पत्र लिखाण सुरू असून तालुक्यातून सुमारे लाखो पत्राद्वारे संगमनेर रेल्वे मार्गाची आग्रही मागणी सुरू असून हे मोठे जन आंदोलन होणार आहे.
याचबरोबर सिन्नर तालुक्यातील जनता सुद्धा 1 फेब्रुवारी रोजी समृद्धी महामार्गाचा रस्ता रोको करणार असून संगमनेर मार्गेच रेल्वे झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, जुन्नर, मंचर, राजगुरुनगर, चाकण या भागातील सर्व नागरिकांनी एकमुखी येऊन नाशिक – पुणे रेल्वे मार्ग हा नैसर्गिक सरळ व्हावा अशी आग्रही मागणी केल्याने हे जनआंदोलन पेटणार आहे. रेल्वे मार्गाच्या या जन आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना पत्रकार संघटना विद्यार्थी संघटना महिला संघटना यांनीही सहभाग घेतला आहे.



