शालेय शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेला संजीवनीचा कृतीतून प्रतिसाद; जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेला संजीवनीचा कृतीतून प्रतिसाद; जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम
शालेय शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेला संजीवनीचा कृतीतून प्रतिसाद; जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम

Kopargaon vijay kapse दि २३ जुलै २०२६: महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मांडलेल्या विधायक संकल्पनेला संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने प्रत्यक्ष कृतीत उतरवत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि देशसेवेची प्रेरणा रुजविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत संजीवनीचे विश्वस्त सुमित कोल्हे व संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण द्यावे, ही संकल्पना मांडण्यात आली होती. या दूरदर्शी विचाराला सकारात्मक प्रतिसाद देत संजीवनीने उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या प्रेरणेने तसेच विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भास्कर वस्ती येथे करण्यात आला.
यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलचे कॅम्पस अॅडमिन व माजी सैनिक विजय भास्कर तसेच राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सोनजे यांनी आवश्यक नियोजन व व्यवस्था केली होती. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य के. एल. दरेकर यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या माजी सैनिक, प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटी आजही अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या प्रेरणेने शिक्षणासोबत राष्ट्रनिर्मितीची मूल्ये रुजविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना दृढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम टप्प्याटप्प्याने कोपरगाव तालुक्यासह परिसरातील अधिकाधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यक्रमास खिर्डी गणेश ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश भास्कर, ग्रामस्थ, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.


