लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेरमध्ये अद्यावत स्मारक उभारणार : डॉ. सुधीर तांबे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेरमध्ये अद्यावत स्मारक उभारणार : डॉ. सुधीर तांबे
अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; सामाजिक समतेचा संदेश

Sangmner vijay kapse दि १ ऑगस्ट २०२६: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दलित, शोषित, कष्टकरी व वंचित समाजाचा आवाज बुलंद करत सामाजिक समतेची चळवळ उभी केली. त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.
संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही अभिवादन करण्यात आले.

डॉ. तांबे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या न्याय, हक्क आणि समतेसाठी संघर्ष केला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. राज्यघटनेतील समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे ही काळाची गरज असून समाजातील सर्व घटकांनी एकजूट ठेवून संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संगमनेर शहरात बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारकही उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी नगरपालिकेने जागाही निश्चित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी समाजभूषण पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर राक्षे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक युवकाने शिक्षण घेऊन समाजविकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रा. बाबा खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या रचनांवरील गीते सादर केली. यावेळी नगरसेवक गजेंद्र अभंग, नितीन अभंग, संतोष गायकवाड, प्रा. प्रदीप पाटील, संदीप आव्हाड, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सचिन शेलार, विजय आव्हाड, देवेंद्र साळवे, विकी साळवे, संजय जमधडे, व्ही. डी. सरकार, विकी पवार, मनीष राक्षे, बाबासाहेब साळवे, विश्वनाथ आल्हाट, दीपक खरात, डी. के. जाधव, संजय शिंदे, सोनू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, काँग्रेस सेवादलाचे जीवन पांचारिया यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान : बाळासाहेब थोरात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून कष्टकरी, श्रमिक आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. फकीरासह ३५ कादंबऱ्या, सुमारे ३०० कथा आणि असंख्य साहित्यकृतींमधून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या साहित्याचे १४ भारतीय तसेच जर्मन, इंग्रजी, पोलिश, रशियन आदी परकीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांचे साहित्य आणि विचार आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.



