डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप

डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप
डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते घारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप

Sangmner vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेला भिंतीवरील घड्याळही भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने संपूर्ण शाळेचे वातावरण उत्साहपूर्ण झाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनात आपण किती कमावले यापेक्षा समाजाला काय दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थी हे उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक आहेत. त्यांच्या हातात पेन आणि वही देणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे उच्च पदावर गेल्यानंतर आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत मदतीचा हात पुढे करावा. मदतीची रक्कम मोठी असणे महत्त्वाचे नाही, तर त्यामागील समाजहिताची भावना महत्त्वाची आहे.” तसेच वाढदिवस व इतर समारंभांवरील अनाठायी खर्च टाळून शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या प्रेरणेतून मागील पाच वर्षांपासून पठार भागातील सुमारे १५ ते १६ जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय साहित्य वितरणाचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. कार्यक्रमास दैनिक समर्थ गांवकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, मुख्याध्यापक बाळासाहेब देवकर, विलास गवळी, विलास ठोंबरे, रंगनाथ गोरे, अमित पन्हाळे, उत्तम तळपे, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.



