संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

वारकरी संप्रदायाने मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला
संगमनेर तालुक्यातील विविध अखंड हरिनाम सप्ताह यांना भेटी
Sangmner vijay kapse दि ५ सप्टेंबर २०२६—मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला दिशा दिली आहे. जात – पात , धर्म याच्यापुढे जाऊन मानवता हा धर्म महत्त्वाचा असून संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा विचारांचा मोठा वारसा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी आज संगमनेर तालुक्यातील विविध अखंड हरिनाम सप्ताह यांना भेटी दिल्या.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी, कवठे कमळेश्वर, कोकणगाव, जोर्वे येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिक महिला यांची उपस्थिती मोठी होती.

या प्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत एकनाथ अशी मोठी संतांची मांदियाळी आपल्याकडे आहे. या सर्व संतांनी जातीभेदावर पहार केला असून मानवतेचा पुरस्कार केला आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे विश्वाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे आहे. तर संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार हा उत्तर भारतापर्यंत केला. संत चोखामेळा यांचे अभिर गुलाल हा अभंग मनाला प्रसन्नता देणारा आहे.

भक्ती आणि अध्यात्म ही मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आषाढी वारी हे एकतेचे मोठे प्रतीक संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने सप्ताह साजरा होतो. देव कवठे ते बोटा असा संगमनेर तालुक्याचा मोठा विस्तार आहे. प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी आपण सातत्याने निधी दिला आहे. मानवतेचे कल्याण हाच राजकारणाचा व जीवनाचा सार आहे.

सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे काम आपण सातत्याने केले असून सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे सदैव ऊर्जा मिळत असते. चांगल्या कामाला ईश्वराचा नेहमी पाठिंबा मिळत असतो. एकमेकांना मदत करावी, मानवता धर्म जपावा असे सांगताना संगमनेर तालुक्याला अध्यात्मिक व विकासातून राज्यांमध्ये अग्रगण्य बनवण्यासाठी आपण कायम काम केले असल्याचे ते म्हणाले.
तर यावेळी हरिभक्त परायण मयुरी ताई शिंदे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते आहेत. थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. गोरगरिबांची सेवा करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे. संगमनेर तालुका आज कृषी सहकार शिक्षण व्यापार आर्थिक समृद्धी बंधू भावाचे वातावरण असा सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशादर्शक ठरणारा आहे.प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाने काम केले तर खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा घडते असे त्या म्हणाल्या.
यावेळी कोल्हेवाडी मधील तरुणाईने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जोरदार स्वागत केले झेन झी कडून झालेले स्वागत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. याप्रसंगी सप्ताह कमिटीचे कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..




