लोकनेते थोरात यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांच्या भावना अनावर; हजारोंची विराट गर्दी, तेच प्रेम, तोच जिव्हाळा
कार्यकर्त्यांशी संवादानंतर अनेकांना अश्रू; लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी संगमनेर तालुका एकवटला


विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित निकालामुळे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात मोठी हळहळ निर्माण झाली. यानंतर राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून अनेक कार्यकर्ते संगमनेर आले. अनपेक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांशी स्नेह मेळाव्यातून संवाद साधला. या मेळाव्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने दाखल झाले. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले दुष्काळी भागाला पाणी दिले याचबरोबर तालुक्यात ४० वर्षात एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने काम करून हा तालुका उभा केला. कधी कुणाचे मन दुखावले नाही किंवा कुणाला त्रास दिला नाही चांगले वातावरण, चांगली संस्कृती ही आपली परंपरा राहीली.

परंतु तालुक्याच्या विकासात कोणी आड येत असेल किंवा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून लढणे माझे कर्तव्य आहे आणि मी ते केले. यापुढेही जनतेसाठी काम करणार आहोत. हे सांगताना चाळीस वर्षात तालुक्यात आणि राज्यात केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. यानंतर तालुक्यातून गावागावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरात यांच्या भेटीसाठी व्यासपीठावर गर्दी केली स्वतःबाळासाहेब थोरात यांनी व्यासपीठावर थांबून प्रत्येकाला अत्यंत आपुलकीने आणि जिव्हाळ्याने भेट दिली. तालुक्यातील कोणालाही हा पराभव मान्य झाला नसून आजही तालुक्यातील जनतेचा यावर विश्वास बसत नाही. यामुळे अनेकांचे डोळे पाणवले तर अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. अत्यंत भावनिक वातावरणात झालेला स्नेह मेळावा आणि त्यानंतर तालुक्यातून प्रत्येक कुटुंबातून निर्माण झालेली मोठी हळहळ हे या संवाद मेळाव्यातून दिसून आले. हजारोंची उपस्थिती, आणि मा.आमदार बाळासाहेब थोरात यांचे मनोगत यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते.
मी हिंदू आहे पण इतर धर्मांचा आदर करतो. कधी कुणाचे वाईट केले नाही किंवा कोणाला वाईट बोललो नाही. तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम केले. मात्र काही लोकांनी जातीयवादी विष पेरले. आपल्याला संघटित होऊन यापुढे लढायचे आहे. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यानंतर हात मिळवण्यासाठी नागरिकांची उपस्थिती आणि हजारोंच्या उपस्थितीने यशोधनचे मैदान तुडुंब भरले याचबरोबर यशोधन सह समोरील विविध इमारतींवर जाऊन कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पाहत आपल्या हृदयात टिपला. तर तालुका व राज्यभरातील अनेकांनी ऑनलाईन हा कार्यक्रम पाहून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.



