लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा राज्यात मोठा आदर – अभिनेत्री राजश्री लांडगे
गाढवाचं लग्न चित्रपटातील गंगीने जागविल्या बालपणीच्या आठवणी
अकोले – संगमनेरची कन्या असल्याचा सार्थ अभिमान

संगमनेर विजय कापसे दि ९ फेब्रुवारी २०२५- अहिल्यानगर जिल्ह्याला नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. विविध तालुक्यांमधील त्या नेत्यांनी त्या तालुक्यांना पुढे नेले आहे. अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून या निसर्गरम्य तालुक्यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून त्यांचा संपूर्ण राज्यामध्ये सर्वांना आदर असल्याचे गौरवोद्गार मराठी चित्रपट अभिनेत्री गाढवाचं लग्न फेम राजश्री लांडगे यांनी काढले आहे.

सौ.दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रा.गणेश गुंजाळ, प्रा.तुषार गायकर, अमृत उद्योग समूहाचे नामदेव कहांडळ, प्रा.मिलिंद औटी,शंकर शिंदे, दत्तात्रय गुंजाळ, निखिल जोर्वेकर, इंजिनिअर अजित गुंजाळ, रितेश गणेश गुंजाळ, दिव्या गुंजाळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी संगमनेर मधील आपल्या बालपणाच्या अनेक आठवणी सांगितल्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सांभाळला आहे. त्यांनी कायम संत आणि कलावंतांचा आदर केला आहे. संगमनेर तालुक्यात झालेला विकास आणि प्रगती हा येथील नेतृत्वामुळे आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला वैभव संपन्न बनवले.

तर संगमनेर शहर स्वच्छ व सुंदर असून या शहराचे सांस्कृतिक वैभव वाढवण्याचे काम सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.ज्या काळामध्ये नेतृत्वाने विविध साहित्यिक, कलावंत यांचा सन्मान केला. त्या काळाची नेहमी इतिहास आणि दखल घेतली आहे. आणि संगमनेर हे उपक्रमशील शहर असल्याने सातत्याने अनेकांना येथे व्यासपीठ मिळत असल्याने योग्य संधी मिळत आहे.

पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त सचिव रो.मा.लांडगे या आपल्या वडिलांनी आपल्याला कायम समाजकारणाचे संस्कार दिले आहेत. मी शाळेत असताना हुशार होते. चित्रकला,कला, गणित आणि सायन्स यामध्ये अभिरुची होती. त्यामुळे सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत राहिले. वडील लांडगे साहेब शेतकरी कुटुंबात असूनही त्या काळामध्ये मंत्रालयात सचिव म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत चांगले काम केले आणि तोच वारसा आम्ही जोपासला आहे. चित्रपट क्षेत्राचा कोणताही वारसा नसताना या क्षेत्रात कुटुंबाचा वारसा जपत प्रत्येक वेळी काम करताना मी 100% योगदान देऊन काम केले.
पुढील काळामध्ये स्पर्धा खूप आहेत. मात्र तरुणांनी आपण जे काम करतो त्यामध्ये पूर्ण क्षमतेने काम केल्यास यश नक्की मिळते.संगमनेर, अकोले मध्ये माझे बालपण गेले असून येथे अनेक आठवणी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले याचबरोबर चित्रपटसृष्टीतील प्रवासाबाबतही अनेक किस्से सांगितले. तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, अत्यंत गुणी अभिनेत्री असलेल्या राजश्रीने महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जपली आहे. ती आपल्या परिवारातील आहे. तिचे बालपण संगमनेर अकोले तालुक्यात गेले आहे. आणि तिच्या कर्तुत्वाचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचा कायम आदर राजश्री ने केला असून वडिलांचे मोठे कर्तृत्व असतानाही त्या नावाचा कुठेही वापर केला नाही. स्वकर्तुत्वावर तिने भरारी घेतली असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी राजश्री लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या आजोळच्या ठिकाणी बराच वेळ घालवला.
अकोले तालुक्यातील कळंब सुंदर बनवणारसह्याद्रीच्या कुशीत वसलेले मुळा खोऱ्यात असलेले कळंब हे छोटी लोकसंख्या असलेले गाव आहे. शेती व्यवसाय करणारे सर्व गावकरी असून या गावासाठी योगदान देत शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान देण्यास माझा नक्की पुढाकार राहील असे त्या म्हणाल्या. तर कळंबचे सुपुत्र तुषार गायकर यांनी या कामासाठी मला सातत्याने मदत केली असल्याचे आवर्जून उल्लेख करत तुषार गायकर यांचा त्यांनी सत्कार केला. कळंब हे गाव सुंदर करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.