हृदयनिवासी १००८ प.पू. संत अमरगिरीजी महाराजांचे पाचवे पुण्यस्मरण भक्तिभावात संपन्न

हृदयनिवासी १००८ प.पू. संत अमरगिरीजी महाराजांचे पाचवे पुण्यस्मरण भक्तिभावात संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि २३ फेब्रुवारी २०२६– आत्मा मालिक ध्यान योग मिशन यांच्या वतीने हृदयनिवासी १००८ प.पू. संत अमरगिरीजी महाराज यांचे पाचवे पुण्यस्मरण रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ (फाल्गुन शुद्ध पंचमी) रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात कोकमठाण येथे पार पडले.

पहाटे ५ ते ६ या वेळेत अभिषेक, पादुका पूजन व प्रातः आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ६ ते ७.३० या वेळेत हवन विधी, तर ७.३० ते ८.३० दरम्यान प्रतिमा पूजन व नवनाथ विधी संपन्न झाला. सकाळी ९ ते ११ या वेळेत वारकरी रत्न ह.भ.प. बाळासाहेबजी महाराज (गतीर, इगतपुरी) यांच्या कीर्तन सेवेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. सकाळी ११ ते १२ या वेळेत श्रद्धांजली, ध्यान पुष्प अर्पण करून मध्यान्ह आरती झाली. दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने ध्यान योग मिशनचे अध्यक्ष आदरणीय संत परमानंद महाराज यांनी हृदयनिवासी १००८ प.पू. संत अमरगिरीजी महाराज यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय उपस्थितांना करून दिला. त्यांनी संत अमरगिरीजी महाराजांनी दिलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचे महत्त्व आणि समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष माननीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी श्रद्धांजली अर्पण करत आपल्या मनोगतात सांगितले,“हृदयनिवासी संत अमरगिरीजी महाराजांचे जीवन हे त्याग, साधना आणि समाजसेवेचा आदर्श आहे. त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग हा मानवतेला दिशा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा दीप आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात अखंड तेवत राहावा, हीच त्यांच्या चरणी खरी आदरांजली आहे.”
या कार्यक्रमास सर्व संत, संत माता व आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा शांत, शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला.




