संगमनेरात नागरिकांचे शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामूहिक वाचन

संगमनेरात नागरिकांचे शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामूहिक वाचन
संगमनेरात नागरिकांचे शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामूहिक वाचन
Sangmner vijay kapse दि २६ एप्रिल २०२६– संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा व सर्वधर्मसमभावाचा विचार सांगणारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाबाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे सेनेचे आ.संजय गायकवाड यांचा निषेध करत शिवगर्जना करून संगमनेर मध्ये डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून नागरिकांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन केले.

संगमनेर मधील नेहरू गार्डन येथे तमाम संगमनेर मधील नागरिकांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, छात्र भारतीचे अनिकेत घुले,प्रा.बाबा खरात, विलास कवडे, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, राम आरगडे, राजा आवसक,ॲड.समीर लामखेडे,अमर कतारी,गजेंद्र अभंग,विनोद राऊत,विजय पवार,सौ.प्रमिला अभंग, अमोल शेलकर, मोहसीन शेख, अशोक सातपुते, विजय सातपुते,रोहिणी गुंजाळ,विजय उदावंत,प्रकाश कडलग यांच्यासह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी कोण होता या सामूहिक वाचनाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रघुपती राघव राजाराम व वैष्णव जनतो हे भजन गाऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवगर्जनेने पुस्तक वाचनाला प्रारंभ झाला.

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व महाराजांचा सर्व धर्मांप्रती असलेला आदर, महिलांप्रती असलेला आदर, राजनीति आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये शिव विचारांच्या जागर करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने बोध देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार आणि सध्याचे शिवभक्त म्हणून घेणारे यांचे विचार यांनी काय बोध घ्यावा हे दर्शविले आहे. या पुस्तकाचे कोणतेही वाचन न करता शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बेताल वक्तव्य केली आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत असून हे पुस्तक खऱ्या अर्थाने घराघरात गेले पाहिजे हा विचार महाराष्ट्रात पुढे आला आहे.

संगमनेर तालुका हा पुरोगामी विचारांचा आणि सर्वधर्मसमभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका एक परिवार म्हणून सातत्याने हा तालुका राज्यात विकासातून अग्रगण्य बनवला. संपूर्ण राज्याला दिशा देणारा संगमनेर तालुका असून हजारो नागरिकांनी एकत्र येऊन या पुस्तकाचे वाचन केले.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, शिंदे सेनेचे आमदाराने केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने निषेध केला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. असभ्य आणि गुंडगिरी असलेले हे लोक महाराष्ट्राच्या सभागृहात कसे जातात असा सवाल त्यांनी विचारला असून सर्वसामान्य जनतेने आता जागरूक व्हायला पाहिजे. बहुजनांमध्ये बुद्धिमान लोक नाहीत हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती इतिहास बदलण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. महाराजांना दहा वर्ष आयुष्य अजून मिळाले असते तर संपूर्ण जगावर त्यांनी राज्य केले असते. महिला सन्मानाचा,समानतेचा विचार महाराजांनी दिला आहे. आणि ज्यांनी महाराजांचा विचार कधीही घेतला नाही असे लोक काहीही बोलत आहेत.महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचे काम हे लोक करत आहेत.अशा विकृत प्रवृत्तीला कधीही थारा न देता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे हि त्या म्हणाल्या. या सामूहिक वाचनात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित पॅंथर, अनिस, छात्र भारती, आरपीआय, विद्यार्थी सेना, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सत्यशोधक विचार मंच, समता विचार मंच यांसह विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती सर्व नागरिकांना देण्यात आला.
विचारांसाठी संगमनेरकर रस्त्यावर एकवटले
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सुसंस्कृत विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. समतेचा आणि प्रगतीचा विचार घेऊन या तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे. नेहरू गार्डन येथे सामूहिक वाचन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य रॅली काढली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले.




