एस.एस.जी.एम. महाविद्यालयात अँटी-रॅगिंग सप्ताहास उत्साहात प्रारंभ

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात अँटी-रॅगिंग सप्ताहास उत्साहात प्रारंभ
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात अँटी-रॅगिंग सप्ताहास उत्साहात प्रारंभ

Kopargaon vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सुसंवादी, भयमुक्त आणि रॅगिंगमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमास औरंगाबाद खंडपीठाचे वकील अँड. अजित झोडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत अध्यक्षस्थानी होते.

मार्गदर्शन करताना अँड. अजित झोडगे म्हणाले, “महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वपूर्ण पर्व आहे. नवागत विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करणारी कोणतीही कृती ही केवळ शिस्तभंग नसून कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अँटी-रॅगिंग कायदा प्रभावीपणे कार्यरत आहे. १८ ते २५ हा वयोगट विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, कायद्याचे पालन करण्याबरोबरच त्याचा गैरवापर होणार नाही, याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे.”

अध्यक्षीय मनोगतात डॉ. घनश्याम भगत यांनी रॅगिंगचे सामाजिक व मानसिक परिणाम स्पष्ट केले. “रॅगिंगमुक्त परिसर हीच सुदृढ शिक्षणसंस्कृतीची खरी ओळख आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसक, अपमानास्पद अथवा मानसिक त्रास देणाऱ्या वर्तनाला विद्यार्थ्यांनी विरोध केला पाहिजे. सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अँटी-रॅगिंग समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत माधव यांनी प्रास्ताविकातून अँटी-रॅगिंग सप्ताहाचे उद्दिष्ट, कायद्यातील तरतुदी आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली. तसेच नवागत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आत्मविश्वासाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी अँड. कुणाल झाल्टे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, प्रा. उज्ज्वला भोर, प्रा. संतोष पवार, डॉ. विशाल पवार यांच्यासह कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटोळे यांनी केले, तर आभार प्रा. प्रियांका पवार यांनी मानले.




