शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी : आ. आशुतोष काळे
शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी : आ. आशुतोष काळे
शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी : आ. आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि २१ जानेवारी २०२६– कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी हंगामाची ई-पिक पाहणी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या संकल्पनेतून शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही ई-पीक पाहणी अॅप डाउनलोड केल्यानंतर ई-पीक पाहणी अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तेथे दिलेली असेल. या अॅपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पिक पेऱ्याची अचूक नोंदणी होवून नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना वेळेत आणि योग्य मदत मिळावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना,अनुदान वाटप, आपत्तीसंबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसह पीकविमा, पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होवू शकतात. त्यामुळे ई-पीक पाहणी करणे अत्यंत गरजेची आहे. ई-पीक पाहणी ‘डीसीएस’ मोबाईल ॲपच्या सहाय्याने रब्बी हंगामात ई-पीक पाहणी करण्याची मुदत १४ जानेवारी पर्यंतच होती. परंतु काही शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करणे बाकी असल्यामुळे ई-पीक पाहणी करण्यासाठी २४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची अद्याप ई-पीक पाहणी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास संबंधित गावचे तलाठी, कोतवाल तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले कृषी सहायक यांची मदत घेऊन आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी. ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास सात-बारावर पीक पेरा कोरा राहील, जो नंतर भरता येत नाही. त्यामुळे पीक विमा व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळवण्यास अडचण निर्माण होईल. ऐनवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती याबाबत पीक विमा मिळण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी रब्बी पिकांची व फळपिकांची नोंदणी करून घ्यावी. ई-पीक पाहणीसाठी दिलेल्या मुदतीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी घाई करून नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.



